[मोताळा लाईव्ह ] :140 कोटी भारतीयांना विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून केंद्र सरकारने यावर्षी 50 लाख 65 हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी 47 लाख 16 हजार कोटी रूपयांचा हाच अर्थसंकल्प होता. 2014 मध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी सरकारने हा अर्थ संकल्प सादर केला तेव्हा साडे सोळा लाख कोटी रूपयांची तरतूद होती. आता 3 पटीने वाढ झाली आहे. तसेच दरवर्षी अपेक्षित उत्पन्नाची वाढ करतांना 26 लाख 96 हजार कोटीची वाढ झाली आहे. येत्या 2047 मध्ये भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकारल्या जाणार आहे अशी माहिती राज्यसभेचे खासदार माजी केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पत्रकार भवन येथे दि. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी पत्रकार परीषदेला भाजपाचे लोकसभा प्रमुख माजी आ. विजयराज शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, सचिन देशमुख, लोकसभा समन्वयक मोहन शर्मा, प्रदेश सचिव शालिनी बुंदे, प्रदेशउपाध्यक्ष ओबीसी मोर्चा विश्वनाथ माळी, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील, चंद्रकांत बर्दे, यश संचेती, विनायक भाग्यवंत, रावसाहेब देशपांडे व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. भागवत कराड यांनी केंद्रिय अर्थसंकल्प या विषयी माहिती देतांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या घोषवाक्याला अनुसरूण 140 कोटी भारतीयांसाठी केंद्राचा अर्थसंकल्प सादर करतांना अन्नदाता शेतकरी, शेतमजूर, कामगार याशिवाय तरूणांना व्यवसायाची संधी व रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योग शिक्षण, रेल्वे यासह सर्वच क्षेत्रात भरीव तरतूद केली आहे. प्रत्येकाला घरे बांधून देण्यासाठी महाराष्ट्रात दि. 22 फेंब्रुवारी रोजी एकाच दिवशी 3 लाख गरजूंना घरकूल मंजूर केले आहे. ग्रामीण व शहरी भागात या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी दोन लाख 12 हजार कोटीचे उत्पन्नात वाढ होणार आहे. सर्व सामान्य व्यक्तींना आपल्या कुटुंबासाठी लागणार्या दररोजच्या गरजा पूर्ण करणारा हा विकसित भारताचा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले.