(मोताळा लाईव्ह ) यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे अशा मतदारांचे मतदार कार्डव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. या 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखवून मतदारांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र नाही, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
या 12 प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.
मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि ओळखपत्र आणून मोठ्यासंख्येन मतदान करावे,, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले आहे.