भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याचा पाया माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी रचला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची श्रद्धांजली

23

( मोताळा लाईव्ह ): भारताला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेवून प्रगत राष्ट्र निर्माण करणारे जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे, अशी दुःखद संवेदना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे.

माजी पंतप्रधान दिवंगत डॉ.मनमोहन सिंग यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन आज सकाळी केंद्रीय आयुष, आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले.

या दुःखद प्रसंगी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करतांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचा पाया डॉ.मनमोहन सिंग यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली. डॉ.मनमोहन सिंग यांनी 1991 च्या आर्थिक संकटात आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाची धोरणे राबवून भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत आधार दिला. अर्थमंत्री म्हणून त्यांनी परकीय चलनाचा साठा वाढवून आणि आयएमएफकडून मदत घेऊन भारताला दिवाळखोरीपासून वाचवले. त्यांचा साधेपणा, नम्रता आणि राष्ट्राप्रती समर्पण सदैव आपल्या हृदयात राहील. त्यांचा वारसा आम्हाला प्रेरणा देत राहील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या संसदेतील व्यापक कार्याबद्दल प्रशंसा व्यक्त केली आहे.

सन २००९ ते २०१४ या कालावधीत मला लोकसभा सदस्य या नात्याने त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या जाण्याने देशावर शोककळा पसरली असून हे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. या दु:खद क्षणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि प्रियजनांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो, देव त्यांना हे अपरिमित नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.

त्यांच्या निधनाने देशाचे सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्व हरपले आहे. देश आपल्या सुपुत्राला मुकला आहे. देशाचे यशस्वी अर्थमंत्री, साहसी पंतप्रधान आणि जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री या नात्याने मी श्रद्धाजंली अर्पण करतो, अशा शब्दांत त्यांनी शोकभावना व्यक्त केल्या.